प्रस्तावना
महाराष्ट्र शासनाचे प्रकाशन क्षेत्रातील जे उपक्रम आहेत त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्याची योजना सर्वाधिक लोकप्रिय योजना ठरलेली आहे. आजवर पाच लाखाहून अधिक वाचकांनी रांगा लावून हे ग्रंथ खरेदी केलेले आहेत. जगातल्या शंभराहून अधिक देशातून या ग्रंथांना मागणी असते. आपल्या देशाच्या कानाकोप-यातून या ग्रंथांसाठी नागरिक विचारणा करीत असतात. त्यामुळे हा ग्रंथ प्रकल्प महाराष्ट्राला सर्वाधिक नावलौकिक मिळवून देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरलेला आहे.
१५ मार्च १९७६ ला सुरु झालेला हा ग्रंथ प्रकल्प वाढत वाढत २१ खंडांपर्यंत जाणार असा अंदाज होता. परंतु सुधारित अंदाजानुसार आता तो दुपटीने मोठा होणार असून या मालिकेचे ४२ खंड प्रकाशित करण्याचा आराखडा शासनाने मान्य केला आहे. आजवर १८ खंड प्रकाशित झालेल्या या योजनेतील खंड १९ व २० आज प्रकाशित होत आहेत. हे दोन्ही ग्रंथ डॉ.आंबेडकरांनी विविध वर्तमानपत्रातून १९२० ते १९५६ या काळात केलेल्या लेखनाचे खंड आहेत. काही खाजगी प्रकाशकांनी डॉ.आंबेडकरांच्या वृत्तपत्रिय लेखनाचे सुटे सुटे काही ग्रंथ यापूर्वी प्रकाशित केलेले असले तरी समग्र पत्रकार डॉ.आंबेडकर या दोन खंडांनी प्रथमच वाचकांना उपलब्ध होत आहेत. यातील काही भाग “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक” या आम्ही प्रकाशित केलेल्या ग्रंथात आला होता. परंतु त्याची २५००० प्रतींची आवृत्ती आता संपलेली असून मूलतः तो “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यांची चळवळ यांच्या अभ्यासाची साधने ' या मालिकेतला ग्रंथ होता. “डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ' या मुख्य मालिकेत हे साहित्य प्रथमच प्रकाशित होत आहे. आम्ही आजवर प्रकाशित केलेल्या १८ खंडांपैकी खंड १ व WAT दुस-या आवृत्त्या काढाव्या लागल्या. पहिल्या खंडांची दुसरी आवृत्तीही आता संपली आहे. अठरापैकी खंड १, २, ३, ५, ६, ७,८,१०,१३,१४,१५,१६ या बारा खंडांच्या आवृत्त्या आज संपलेल्या आहेत. संदर्भ साहित्याच्या प्रकाशित झालेल्या दोन्ही खंडांच्या प्रतीही संपलेल्या आहेत. हा महाराष्ट्रातल्या प्रकाशन विश्वातला चमत्कारच मानावा लागेल. आपल्या महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे एखाद्या ग्रंथांच्या १ ते ३ हजार प्रतींची आवृत्ती काढण्याची