२५५
_ प्रोफेसरांनी अध्ययन, अध्यापन
आणि संशोधनाच्या कामी स्वतःला वाहून घ्यावे
मुंबई येथील सेंट झेवियर्स कॉलेजातील पुराणवस्तुसंशोधन व पुराणेतिहास या विषयाचे विद्वान् प्रोफेसर रेव्हरंड फादर हेरास यांचे सिद्धार्थ कॉलेजात महें-जो-दारो येथील लेखवाचन या विषयावर एकदा उद्बोधक भाषण झाले. त्यादिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोफेसरांचे संशोधनकार्य या विषयावरच विवेचन करण्यास सुरवात केली. ते म्हणाले,
फादर हेरास यांनी अत्यंत परिश्रम करून महें-जो-दारो येथे सापडलेल्या नाण्यांवरील व विटांवरील लेख कसे वाचावे याचा अपूर्व शोध केला याबद्दल कोणालाही आनंद, अभिमान व आश्चर्य वाटल्यावाचून राहाणार नाही, पण मला वाटते की, ज्याप्रमाणे फादर हेरासनी एकध्येय वृत्तीने या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला स्वतःला वाहून घेतले व अत्यंत प्रचंड असे संशोधन केले तसेच आमच्या हिंदी प्रोफेसरांनी का केले नाही असा एक माझ्या पुढे प्रश्न उभा राहातो, की आमच्या हिंदी प्रोफेसरांना तशी आवडच नाही ? किंवा त्यांच्याजवळ पुरेशी विद्वता नाही किंवा त्यांच्यापाशी पुरेशी साधनसामग्री नाही ? ह्या गोष्टींची कारणे काय असली पाहिजेत याचा आपण बारकाईने विचार करू.
मला वाटते की थोडेसे रुपये मिळवावेत व आपली सुखाने कालक्रमणा करावी यापलीकडे आमच्या प्रोफेसरांना आयुष्यात काही महत्त्वाकांक्षाच नाही. या महत्त्वाकांक्षेच्या अभावामुळे त्यांच्या हातून काहीही भरीव कार्य होत नसावे, ते मधून मधून काही पाठ्य-पुस्तकांवर टिपणे लिहितात. टिपणे लिहिण्याच्या पलिकडे काही महत्त्वाचे कार्य आहे याची माहिती त्यांना आहे की नाही कोण जाणे !
इतक्यात एक प्रोफेसर म्हणाले, ''आ्ही प्रोफेसर मंडळी हल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळणाऱ्या शिक्षणपद्धतीपासूनच निर्माण झालेलो आहोत. यासाठी आपल्याला प्रोफेसरांना दोष न देता तो युनिव्हर्सिटीच्या शिक्षणपद्धतीलाच द्यावा लागेल. *
तेव्हां डॉक्टर म्हणाले, आमच्या युनिव्हर्सिटीतील शिक्षणपद्धतीमुळे उत्तम उत्तम प्रोफेसर निर्माण होणे कठीण झाले आहे हे मला कबूल आहे. आमच्यापैकी बऱ्याचशा प्रोफेसरांना शेक्सपियरची नाटके किंवा काव्ये कॉलेजातून शिकवावी लागतात. हे विषय शिकविल्यापासून आमच्या तरुण पिढीचा किंवा हिंदुस्थानाचा काय फायदा होतो ? काहीही फायदा होत नाही
नवयुग : आंबेडकर विशेषांक-१३ एप्रिल १९४७.
भाषणाची तारीख दर्शविलेली नाही. त्यामुळे नवयुग अंकाच्या तारखेनुसार स्थान दिले
` आहे..--संपादक.