संपादकीय
आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व हे अनन्यसाधारण स्वरुपाचे आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्राचा चेहरा मोहरा अंतर्बाह्य उजळून निघाला आहे. त्यांनी मराठी मानसिकतेला परिवर्तनवादी विचारांची नवीन दिशा दिली. त्यांच्या या नवविचारांमुळे महाराष्ट्रात सर्वस्पर्शी प्रबोधनपर्व उभे ठाकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे निर्माण केलेली प्रबोधनाची प्रक्रिया ही सर्वकष स्वरुपाची होती. येथील गतानुगतिक समाजमनाला गतिशील करणारी होती. बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही सामाजिक गतिशीलता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. त्यांच्या या सामाजिक गतिशीलतेला व्यापक स्वरुपाचे भारतीय परिमाण आहे. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल भारताला तेजोभान प्राप्त करून देणारे विचारवंत होते. त्यांचे लेखन व चितन हा आधुनिक भारतातील लेखन-चितनाचा महत्त्वपूर्ण आविष्कार होय.
बाबासाहेब आंबेडकरांचा लेखनाविष्कार प्रामुख्याने इंग्रजी भाषेतून प्रगट झालेला आहे. त्यांचे बहुतांश लेखन इंग्रजीत आहे. असे असले तरी त्यांनी मराठी भाषेतूनही लेखन केलेले आहे. त्यांचे मराठी लेखन संख्यात्मक दृष्टीने अल्प व मर्यादित स्वरुपाचे आहे. पण गुणात्मक दृष्टीने त्यांचे हे लेखन अत्यंत महान स्वरुपाचे आहे. बाबासाहेबांच्या मराठी लेखनातील गुणात्मकता ही इतकी मौलिक आहे की त्यामुळे त्यांचे लेखन मराठी अक्षरवाङ्मयात सहजपणे स्थान घेऊ शकते. बाबासाहेबांच्या मराठी लेखनाचे अक्षरत्व महाराष्ट्रीय समाजापर्यंत पाहिजे तितके पोचलेले नाही. त्यांचे मराठी लेखन हा काहीसा अलक्षित व दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. बाबासाहेबांनी मराठीमधून वृत्तपत्रीय लेखन केले. त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत या चार वृत्तपत्रांना जन्म दिला. या वृत्तपत्रांमधून त्यांनी प्रभावीपणे नवविचारांची मांडणी केली. ही मांडणी आधुनिक महाराष्ट्राची नव्याने
जडणघडण करणारी सिद्ध झाली आहे.
या एकोणिसाव्या खंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे मूकनायक व बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांतील अग्रलेख व स्फुट लेख संग्रहित करण्यात आले आहेत. बाबासाहेबांनी मूकनायक हे वृत्तपत्र १९२० मध्ये काढले. या मूकनायकच्या रुपातून त्यांनी मूक असलेल्या दलित समाजाचे नायकत्व