२६-११-१९२७ अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया - Page 131

अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया ८९

करणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यास अवश्य तो स्वार्थ त्याग करील, इतकेच नव्हे तर प्राणावरही तिलांजली देण्यास तयार होईल! इतक्या थराला गेलेल्या प्रजेस बहिष्काराची तमा काय असणार? व ज्यांनी जाणूनबुजून ही तपश्‍चर्या पत्करली आहे त्यांना इशारा देण्याचे काय कारण ? बरे या विघ्नसंतोषी लोकांनी वाजविलेल्या सत्याग्रह विरुद्ध बहिष्कार या भयसूचक घंटेचा नाद ऐकून भेदरून जाण्याचे काहीच कारण नाही. कारण बहिष्कारासारखे आत्मघातकी शस्त्र कोणीही हाती धरू शकत नाही व धरलेच तर ते फार दिवस wes शकत नाही. ज्याप्रमाणे आम्ही अस्पृश्य आहोत हे आम्ही कबूल करणार नाही असे अस्पृश्य लोक म्हणतात त्याचप्रमाणे तुम्ही स्वराज्याला लायक आहात असे आम्ही कबूल करणार नाही, असे इंग्रज लोकही स्पृश्य लोकाना म्हणतात. जसे आज

अस्पृश्य लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी बहिष्कार पुकारण्याची इशारत दिली जात आहे, त्याचप्रमाणे इंग्रज सरकारलाही ठिकाणावर आणण्यासाठी स्वदेशीची उर्फ बहिष्काराची मोहीम सुरू करण्यात आली होती व ती किती तरी वर्षे चालू होती. परंतु सर्वांना ठाऊक आहे की, त्यापासून इंग्रज सरकारच्या केसालाही धक्का लागला नाही. याचे कारण अगदी उघड आहे. जेथे परस्परातील आर्थिक संबंध दाता व याचक अशा परीचा असतो तेथे ही बहिष्काराची मात्रा लागू पडण्याचा संभव असतो. कारण, दात्याने जर याचकावर बहिष्कार घातला तर त्याने दात्याचे काहीच नुकसान होत नाही. परंतु जेथे परस्परातील -संबंध दानाच्या स्वरुपाचा नसून विनिमयाच्या स्वरूपाचा असतो तेथे बहिष्काराची मात्रा चालत नाही. अशा अवस्थेत बहिष्कार घालणे म्हणजे विनिमयाने होणारा स्वार्थ बुडविणे असाच त्याचा परिणाम होतो. दरेकाची स्वार्थावर नजर असल्याकारणाने परस्परांवर बहिष्कार घालून विनिमयाने होणारा स्वार्थ बुडविण्यास कोणीच तयार नसतो. तसे जर नसते तर गिरणीच्या मालकांना पोटभरू मजूरांवर कायमचा बहिष्कार टाकता आला असता व इंग्रज व्यापाऱ्यांविरूद्ध स्वदेशीच्या काळात पुकारलेला बहिष्कार सिद्धीस गेला असता. हे घडत नाही याचे कारण असे की बहिष्काराने जर फक्त शत्रूलाच घाव बसता तर त्याच्यासारखे इतरास वठणीवर आणण्याचे दुसरे महान शस्त्र नव्हते. परंतु त्या शस्त्राची अशी विचित्र गती आहे की त्याच्या माऱ्याने शत्रूच्या बरोबर स्वतःलाही घाव होतो. जे लोक बहिष्काराची धमकी देतात त्यांना हे बहिष्काराचे शस्त्र एकेरी आहे किंवा दुहेरी आहे, याचा समज झाला नसावा किंवा अस्पृश्य समाज परोपजीवी असून स्पृश्य