महाड सत्याग्रह परिपद १२१
ते अधिकारास लायक होण्यापूर्वी सर्वाना, मग ते कितीही असमान असोत, सारखे वागवणे हाच न्याय आहे. समाजशास्त्राच्या मते ज्याच्या अंगी जो गुण आहे त्याचा पूर्ण विकास होण्यास सामाजिक व्यवस्था ही अत्यंत मोठी कारणीभूत अशी गोष्ट आहे. गुलामांना नेहमीच असमानतेने वागविण्यात आले तर त्यांच्या ठायी दास्यत्वाला योग्य अशा गुणांखेरीज कोणताच गुण उत्पन्न व्हावयाचा नाही व गुलाम दुसऱ्या कोणत्याच अधिकारास पात्र होणार नाही. त्याचप्रमाणे अस्वच्छ माणसास स्वच्छ माणसाने दूर लोटले व त्याशी व्यवहार बंद केला तर अस्वच्छ वृत्तीचा माणूस स्वच्छपणे राहण्याची इच्छा करणार नाही. गुन्हेगार जातींना म्हणजे अनेतिक जातींना नैतिक जातींनी आश्रय दिला नाही तर अनैतिक जातीस नीतीचे शिक्षण केव्हाच प्राप्त होणार नाही. यावर दिलेल्या उदाहरणावरून एवढी गोष्ट सिद्ध आहे की, समतेची वागणूक ही ज्याच्या ठायी गुण नसतील ते गुण उत्पन्न करण्यास ती कारणीभूत होत नसली, तरी एवढे खरे की, समतेच्या वागणुकीशिवाय अंगी असलेले गुण कधीही विकास पावणार नाहीत. समतेच्या वागणुकीशिवाय नैसर्गिक गुणांचा विकास होत नाही हे जसे खरे आहे तसेच समतेच्या वागणुकीशिवाय अंगी असलेल्या गुणांचेही चीज होत नाही. एका हाताने हिंदू समाजातील असमानता व्यक्तीचा विकास खुंटवून समाजाला खुरटा करते. दुसऱ्या हाताने हीच असमानता व्यक्तीत साठवून ठेवलेल्या शक्तीचा समाजास योग्य तो उपयोग करू देत नाही. दोन्ही बाजूने चातुर्वर्ण्याने विस्कळित. झालेल्या या हिंदू समाजास ही असमानता दुर्बल करीत आहे. यास्तव हिंदू समाज समर्थ करावयाचा असेल तर चातुर्वर्ण्य व असमानता याचे उच्चाटन करून हिंदू समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दोन तत्त्वांच्या पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारणाचा मार्ग हा हिंदू समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणून मी म्हणतो की, आपले कार्य जितके स्वहिताचे आहे तितकेच राष्ट्रहिताचे आहे, यात काही किंतु नाही.
हे कार्य खरी समाजक्रांती घडवून आणण्यासाठी आरंभिले आहे. केवळ गोड शब्दांच्या मधुर स्वराने मोहून गेलेल्या मनाची समजूत करण्यासाठी मांडलेला हा खेळ आहे, अशी कोणीही आपली भूल करून घेऊ नये. या कार्याला भावनेचा ठाव आहे व ती भावना या कार्याला चालना देणारी शक्ती असल्यामुळे या कार्याची गती थांबणे किंवा थांबविणे आता कोणालाच शक्य नाही. ज्या समाजक्रांतीचा
आज येथे प्रारंभ होत आहे ती समाजक्रांती शांततेने घडून येवो अशी मी या
ठिकाणी त्या जगन्नियंत्याची प्रार्थना करतो. ही समाजक्रांती शांततेने घडू देण्याची जबाबदारी आमच्यापेक्षा आमच्या प्रतिपक्षावर जास्त प्रमाणात आहे. याबद्दल कोणाला शंका घेता येणार नाही. ही 'समाजक्रांती अत्याचारी होईल किंवा अनत्याचारी होईल हे सर्वस्वी स्पृश्य लोकांच्या वागणुकीवर अवलंबून