एकसंध भारत आमचे ध्येय आहे ___ १९७
ते विचारात घेतलेच पाहिजे ! या जनसमूहाच्या भिन्नतेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून कसल्याही शर्ती व मर्यादांशिवाय भारताच्या स्वातंत्र्यासाठी अट्टाहास धरण्याची भारतातील काँग्रेसवाल्या लोकांची वृत्ती आहे. सज्जनहो, जर भारतातील विभिन्नता लक्षात न घेता घटना तयार करण्याचे ठरविले तर शासनाची शक्ती कोणाच्या हातात जाऊ शकेल ? अल्पसंख्यांक जमातीच्या हाती दिल्या जावी असे तुम्हास वाटते काय? खालच्या वर्णाच्या लोकांच्या हाती ती दिल्यास योग्य होईल, असे तुमचे मत आहे काय? मला जर कशाची पक्की खात्री असेल तर ती याचीच की, भारतीय समाजातील वस्तुस्थिती जमेस न धरण्यास भारताच्या भावी स्वराज्याच्या शासनशक्तीची सूत्रे भारतीय समाजातील उच्चशिक्षित, मातब्बर व महत्वाकांक्षी अशा उच्चवर्णातील लोकांच्याच हाती जातील, म्हणजे ` संपत्ती, शिक्षण व सामाजिक दर्जा प्राप्त असलेल्या सरंजामदारांच्या हाती ही सूत्रे जातील. जीवनाच्या अन्य क्षेत्राप्रमाणेच राजकारणातही शक्तीशाली लोकांनाच विजय प्राप्त होत असतो. या सरंजामदार वर्गाला शिक्षण व संपत्तीची शक्ती सहजपणे सहाय्यक होईल. परंतु आपल्या राजकीय वाट्यासाठी दुर्बल समाजघटकांना सरंजामदार गटाला सहाय्यकारी असलेल्या केवळ या शक्तीविरुद्धच लढून भागणार नाही तर वरपांगी अत्यंत सूक्ष्म दिसणारी पण बरीच प्रभावकारी अशी आणखीही एक शक्ती आहे. ती त्याच्या सामाजिक दर्जामध्ये अंतर्भूत आहे. या समाजरचनेच्या ठराविक साच्यात पात्रतेला किंवा गुणवत्तेला काहीच स्थान नाही. भारतात केवळ जातभावनेला विशेष महत्व असून ही भावना परजातीच्या लोकांशी लढण्यास प्रवृत्त करते. या भावनेचे वर्चस्व बहुसंख्यांक जमातींच्या मनात कार्यरत असल्यामुळे अल्पसंख्यांक जमातींना ते भयानक अडथळे निर्माण करतील आणि राज्य शासनाचे दरवाजे कदाचित त्यांच्यासाठी कायमचे बंद करून टाकतील. या सामाजिक परिस्थितीच्या कार्यवाहीचा भयानक परिणाम दलित वर्गावर झाल्यावाचून राहू शकत नाही. हिंदू धर्मानुसार भारतातील जातीची रचना चढत्या क्रमात आदराची व उतरत्या क्रमात तिरस्कारपूर्ण आहे, याची जाणीव तुम्हाला आहेच. या दर्जावर उतरंडीचा परिणाम म्हणून खालच्या दर्जाच्या जातीतील लोकांच्या मनात उच्च दर्जाच्या जातीतील उमेदवारासंबंधी पसंतीची भावना निर्माण होते, तर या उलट खालच्या जातीतील उमेदवारासंबंधी तिरस्काराची भावना निर्माण होते. या मानसिक स्थितीचा दलित वर्गाच्या शासन सत्तेसाठी चाललेल्या धडपडीवर निश्चितच वाईट परिणाम होईल. अस्पृश्य उमेदवाराला एकही मत न टाकता स्पृश्य लोक अस्पृश्यांची अनेक मते यामुळे मिळवू शकतील; आणि याचा परिणाम असा होईल