७३
बुद्धीचा उपयोग
भाकर, शिक्षण व राज्यसत्ता मिळविण्यासाठी हवा
[ सोपारे (वसई) येथे दिलेले भाषण. ]
अध्यक्ष महाराज, प्रिय बंधुंनो व भगिनींनो,
श्री. वनमाळी यांनी म्हटल्याप्रमाणे सदर परिषद मागेच व्हावयाची होती, परंतु मला तिसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सचे आमंत्रण आल्यामुळे सभेस हजर राहता आले नसते व त्यामुळे मंडळींची निराशा झाली असती. असो. आजचा प्रसंग ज्या चेवली चांभार मंडळींनी घडवून आणून या भागातील अस्पृश्य वर्गापुढे बोलण्याची मला संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पहिल्या राऊंड टेबल परिषदेसाठी मी लंडनला गेलो असताना माझी केविलवाणी स्थिती झाली होती. त्यावेळी हिंदू-मुसलमान सभासदात बेबनाव उत्पन्न झाल्यामुळे अस्पृश्यांची बाजू मांडणे फार त्रासाचे झाले. शेवटपर्यंत आमच्यात एकमत न होऊ शकल्याने पहिले वर्ष फुकट गेले असे आम्हा सर्वानाच वाटले. शिवाय त्यावेळी काँग्रेस व तिचे सर्वाधिकारी म. गांधी परिषदेपासून अलिप्त होते. दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी महात्मा गांधी व काँग्रेसचे इतर प्रतिनिधी हजर राहून त्यांनी भाग घेतल्यामुळेच महत्व आले. दुसऱ्या परिषदेत काहीतरी भरीव कार्य होईल अशी सर्व हिंदी सभासदांनी आशा व्यक्त केली होती, परंतु अखेर ती फोलच ठरली. त्यावेळी राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या सर्व हिंदी सभासदात इतकी दुही माजली की कोणताच प्रश्न धसाला लावता आला नाही. त्यावेळी असे होण्याचे कारण एकटे म. गांधी हेच होत. एकीकडे मुसलमान व एकीकडे स्पृश्य हिंदू व मधे अल्पसंख्यांक अस्पृश्य वगैरे जातीचे प्रतिनिधी अशी चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मी भांबावून गेलो होतो. अस्पृश्यांविषयी म. गांधी काही स्वतंत्र योजना करतील याची मला आशा नव्हती. कारण मी दुसऱ्या परिषदेला जाण्यापूर्वी त्यांच्या माझ्यात झालेल्या मुलाखतीवरून मला हे समजलेच होते, परंतु अस्पृश्य वर्गासाठी मी जी योजना पुढे मांडीन तिला महात्माजी विरोध मात्र करणार नाहीत, अशी मला पूर्ण आशा होती. परंतु सगळेच उलट घडले, ' इतरांनी पसंत केलेल्या अस्पृश्यांच्या योजनेला मी विरोध करणार नाही “ असे ज्या महात्माजींनी हिंदुस्थानात कबूल केले होते, नव्हे जवळ जवळ मला वचन
जनता : २९ एप्रिल १९३३. |
भाषणाची तारीख नमूद नाही.-संपादक.