धर्मातराने सर्व . . . . , . . , कल्याण होईल ४४७
कोणी ' खूळ ' किंवा ' भूत ' असेही म्हणतात. परंतु यात माझा वैयक्तिक असा काडीचाही स्वार्थ नसून उलट नुकसानच आहे. आज मी अशा स्थितीत आहे की, कोणतीही व्यावहारिक अगर लौकिकाची गोष्ट मला सहज साध्य करून घेता येणार आहे. माझी ही गर्वोक्ती नसून तो आत्मविश्वासाचा पडसाद आहे (टाळ्या). व्यक्तिच्या हिताच्या दृष्टीने माझा या धर्मातरात तोटाच आहे. महारात मी शिकलेला बॅरिस्टर म्हणून आज मला जो मान आहे, तो मी खिस्ती किंवा मुसलमान झाल्याने शिल्लक राहणार नाही, कारण त्या समाजात माझ्यासारखे शिकलेले कित्येक पडले आहेत. त्यातच मी एक जसा होईल. तेव्हा माझा त्यात वैयक्तिक फायदा नाही. उलट तो तोटाच आहे. पण ज्यांनी विश्वासाने जबाबदारी टाकली आहे, त्यांना नरकात पिचत ठेवून मला माझा मोठेपणा कायम ठेवावयाचा नाही. तर त्यांच्या उद्धाराकरिता मी माझ्या स्वार्थावर पाणी सोडण्यास तयार आहे (टाळया).
आपल्या चळवळीच्या मुळाशी काही तरी खात्रीने आधार आहे यात शंका नाही. नाही तर परस्परविरुद्ध अशा दोन्ही पक्षांकडून ' एक कोट रुपिया देयेगे ' अशी भाषा आली नसती. आपल्या या चळवळीच्या मुळाशी अधिष्ठान खात्रीने आहे.
आजची वेळ मोठी आणीबाणीची आहे. इंग्रजीत ज्याला Now or Never म्हणतात तशी ही वेळ आली आहे. तेव्हा गाफील राहू नका. काळ आणि वेळ यांची गाठ पडली, तरच कार्यभाग होत असतो. तशी ही वेळ आहे. तेव्हा या घडीला आपला निर्धार कायम करा.
आजच्या आज चुटकीसरसे. धर्मातर होऊन सर्व अस्पृश्य समाज दुसऱ्या धर्मात जाईल असे समजण्याइतका मी काही खुळा नाही. तेव्हा मला जे थांबा, कळ काढा असे म्हणतात, त्यांना एवढेच सांगणे आहे की, दहा वीस वर्षांनी जे होणार आहे त्याचीच सुरवात आजच आम्हास केली पाहिजे. कालांतराने आपोआप होईल असे म्हणून स्वस्थ बसण्यात अर्थ नाही. आपोआप काहीच होत नसते. दहा वीस वर्षांनी जी फळे दृष्टीस पडणार आहेत, त्यांचे बी तरी आज लावलेच पाहिजे. ते न लावले तर झाड नाही, आणि फळ तर नाहीच नाही. तेव्हा आपणास जे ' ठैरो ! ' म्हणून सांगतील ते आपले दोस्त नसून दुष्मन आहेत असे समजा व आपल्या निर्धाराप्रमाणे संघटनेच्या कार्याला
लागा. (प्रचंड टाळ्या)