११-२-१९३६ सर्वानी दृढनिश्चयाने आणि संघटितपणे कूच करावयाचे आहे - Page 492

८०

सर्वांनी दृढनिश्चयाने आणि संघटितपणे .

कूच करावयाचे आहे

मंगळवार ता. ११ फेब्रुवारी १९३६ रोजी अहमदनगर मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. सभा डॉ. बाबासाहेबांच्या स्वागतार्थ बोलाविली होती. सभेस ५००० वर जनसमूह जमला होता. शहरातील काही प्रमुख मंडळीही हजर होती. आरंभी स्थानिक अस्पृश्य पुढाऱ्यांची भाषणे झाली. त्यात सर्वांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुढारीपणावरील आपला पूर्ण विश्वास प्रगट करून त्यांची धर्मातराची घोषणा आपल्याला सर्वतोपरी मान्य असल्याचे जाहीर केले.

बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

धर्मांतराच्या प्रश्‍नाबद्दल बोलण्यास आज मी आलो नव्हतो. कारण जाहीर केल्याप्रमाणे अस्पृश्यांच्या एका युवक संघाचे उद्घाटन करावयाचे एवढेच माझे काम होते. परंतु आज आपण इतके लोक येथे मोठ्या उत्कंठेने जमला आहात. तुम्हा सर्वांची निराशा करणे शक्य नाही. प्रथमतः मी निक्षून सांगतो की, धर्म बदलणे ही बाब aed नाही किंवा तो तमाशा नाही. ढोलके बडवून नुसता गाजावाजा करण्यासारखी ती गोष्ट नाही. धर्मातर हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा विषय आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण चार महिन्यापूर्वी धर्मातराची भाषा मी जाहीररीतीने बोलल्यापासून मला.त्या गोष्टीचा एकसारखा सांगोपांग विचार करावा लागत आहे व तिचे मनन करावे लागत आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की, मी जो निश्चय जाहीर केला आहे त्याबद्दल पश्चात्ताप करण्याचे मलां बिलकूल कारण वाटत नाही. तुम्ही देखील या प्रश्‍नाचा अत्यंत खोल विचार करावयास पाहिजे. रोज पाच मिनिटे तरी तुम्ही त्याचे मनन करा. आता साहजिक असा प्रश्‍न उभा राहतो की हा निश्चय कृतीत. आणण्यास विलंब का ? तुम्हाला मी एक लहानसा दृष्टान्त देतो. त्यावरून आपल्याला कळेल की, हा प्रश्‍न किती धिमेपणाने सोडविणे प्राप्त आहे. सेनापतीला ज्यावेळेस सैन्याचा तळ हलवून कूच करण्याचा हुकूम द्यावयाचा असतो त्यादेळेस धडधाकट व जवान शिपायांचाच विचार करून भागत नाही तर अपंग, जखमी किंवा आजारी शिपायांची देखील त्यास काळजी वाहून सर्वाना बरोबर नेणे त्यास जरूर असते. कृतनिश्चयाने

जनता : २२ फेब्रुवारी १९३६