समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने झटले पाहिजे २३
त्वेष येत नाही, याचे कारण त्यांना या अन्यायाची जाणीव होत नाही, मनुष्य एखाद्या हुद्यावर चढण्यास लायक असताना जर त्याला जातीभेदामुळे तो हुद्दा प्राप्त होत नाही तर, तशा मांणसाला जातीभेद कसा नडतो; हे त्याला कळू लागेल व त्याला आपल्या चळवळीचे मार्ग कळून तो तिचा पुरस्कर्ता होईल. पण ज्याला त्या जागेवर जाण्याची लायकी नसेल, तर त्याला जातीभेदाचे उग्र स्वरूप कसे कळणार ? जातीभेद असला काय आणि नसला काय, तो आहे तेथेच राहणार म्हणून आपल्या लोकांची लायकी वाढण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. गुणात समता आली म्हणजे जातीभेदात साठविलेली अस्पृश्यता फार दिवस टिकणे शक्य नाही.
आपला समाज अशा रितीने सज्ज झाला पाहिजे. जशा प्रकारची सामाजिक किंवा राजकीय स्थिती आपल्याला हवी असेल, तशा प्रकारची स्थिती आपल्याला प्राप्त करून घेण्यात फार वेळ लागणार नाही. हे मत कदाचित आपल्याला पोरकट असे वाटेल पण मला वाटते त्याला बराच आधार आहे.
हल्लीचा काळ या देशाच्या दृष्टीने मोठा आणीबाणीचा आहे. स्वराज्याचा पाया जेव्हा १९१७ साली घालण्यास सुरुवात झाली तेव्हापासून या देशात तीन कंपू झाले आहेत. (१) युरोपियन लोकांचा, (२) मुसलमान लोकांचा, (३) हिंदू लोकांचा. १९१७ सालापूर्वी मुसलमानांशी हिंदूंचा राजकीय बाबतीत ३६ चा आकडा असे. आता तो ६३ चा होऊन दोघांमध्ये भयंकर प्रकारचे सख्य होऊन, दोघांनी एकवट होऊन स्वराज्याचा पहिला हप्ता इंग्रजांपासून घेतला आहे. पण वाटणीच्या वेळी सख्ख्या भावांमध्ये देखील तेढ निर्माण झाली आहे. स्वराज्य जर मागितले तर त्यातील मोठा वाटा कोणास जाणार, हा एक लढ्याचा प्रश्न होऊन पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर हेच की, ज्यांची लोकसंख्या जास्त त्यास स्वराज्याचा भागही जास्त मिळणार. मुसलमानांना आपली लोकसंख्या जास्त असावी असे वाटणे साहजिक आहे. त्याचप्रमाणे हिंदुंना ती कमी न व्हावी असे वाटणे साहजिक आहे. उभयपक्षाचा आपल्यावर कटाक्ष आहे. आपल्याशिवाय मुसलमानांना जय नाही. आपल्याशिवाय हिंदुंना गती नाही. आज आम्ही हिंदुचे हिंदू राहिलो, तरच आर्यधर्माची संस्कृती या देशात निपजणार आहे. उलट आज जर आम्ही हिंदुचे मुसलमान झालो तर या देशात यवनी संस्कृतीचे प्राबल्य होणार आहे हे आज हिंदू आणि मुसलमान या दोघांच्याही ध्यानी आले आहे. तसे जर नसते तर वैकोम येथे ब्राह्मण वर्ग अस्पृश्य वर्गासाठी सत्याग्रह करण्यास तयार झाला नसता अथवा मुसलमान लोक कोटी रुपये खर्च करून आपल्याला त्यांच्या धर्माची दीक्षा देण्यास उत्सुक झाले नसते. आज
आपण जरी सर्वात खालचे आहोत तरी या हिंदू-मुसलमानाच्या संस्कृतीच्या
संग्रामात आपली कुमक आपल्या संख्येच्या मानाने फार महत्त्वाची आहे व आपण