१०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
व थक्क करून सोडणारे प्रसंग पाहण्यास मिळतात की, या विभिन्न संस्थातील
लढाई, कामगार आणि मालक जर तसे असेल तर यांच्यातील लढाईपेक्षा फारच
दुर्घर असते आणि हे सर्व कशासाठी, तर काही लोकांना कामगारांचा पुढारी
म्हणून मिरवून घेण्याची व त्यावर सत्ता गाजविण्याची केवळ हौस असते
एवढ्याचसाठी! तिसऱ्या प्रकारचे नेतृत्त्व कम्युनिझमच्या तत्त्वावर विश्वास
असणाऱ्यांचे आहे. त्यांचा हेतू कदाचित चांगलाही असेल परंतु ते भलत्याच मार्गाला लागलेले आहेत आणि त्यांच्यापेक्षा कामगारांचा अधिक नाश दुसऱ्या कोणीही केला नाही, असे म्हणण्यास मी मुळीच कचरणार नाही. आज जर कोणत्या कारणाने कामगार संघटनेच्या पाठीचा कणा पूर्णत: तुटला असेल, जर
आज मालक कोणत्या कारणाने वरचढ झाले असतील, जर आज कामगार संघटन
ही एक शापित वास्तू होऊन बसली असेल तर त्याचे एकमेव कारण म्हणजे एकेकाळी कामगार संघटनेवर कम्युनिस्टांचा पूर्णत: कब्जा झाला होता व याचा. त्यांनी दुरुपयोग करून घेतला हेच होय. कामगारांमध्ये कोणत्याच प्रकारचे असमाधान नाही, असे समजून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करणे, हे त्यांचे ध्येय असावे, असे दिसते. कारण असंतुष्ट कामगार वर्गाच्या संघटनेद्वारे क्रांती घडवून आणता येईल व कामगारांचे राज्य स्थापन करता येईल, असा त्यांना विश्वास वाटतो. म्हणून कामगारात असंतोष निर्माण करण्याची व त्याद्वारे कामगारात संघटन बांधण्याची त्यांनी मोहीम उघडली आहे. क्रांती यशस्वी होण्यासाठी केवळ असंतोष पुरेसा नसतो. त्यासाठी कशाची आवश्यकता असेल तर न्याय्यतेची, गरजेची आणि सामाजिक व राजकीय हक्कांची गंभीर व परिपूर्ण जाणीवेची. क्रांतिकारक मार्क्सिस्टही जितकी रानटीपूजा संपाची करीत नाहीत इतकी रानटीपूजा सिंडिक्यॉलिस्ट (केवळ कार्यकारी मंडळ असलेले) कम्युनिस्टांनी मागील काळात केलेली आहे. क्रांतिवादी मार्क्सिस्टांनी संपांना कधीही ' क्रांतीचा पहिला पाठ ' मानलेला नसून सर्व उपाय थकल्यानंतर वापरावयाचे एक गंभीर व अंतिम साधन म्हणूनच मानले आहे. परंतु कम्युनिस्टांनी हे सर्व वाऱ्यावर भिरकावून देऊन कामगारांमध्ये असंतोष निर्माण करण्याचे एक दैवी साधन या दृष्टीने संपाकडे पाहिले. त्यांनी अधिक जास्त असंतोष निर्माण केला असो की नसो परंतु त्यांच्या शक्तीचा व सत्तेचा मुख्य स्त्रोत असलेल्या कामगार संघटनेचा मात्र निश्चितच सर्वनाश केला आणि सध्या ते भांडवलशाही संघटनांचा आश्रय शोधण्याच्या मार्गास लागलेले आहेत. अशाप्रकारच्या निरर्थक चळवळीपासून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करता येण्यासारखी आहे. आगीचा भडका उडवून देण्याच्या प्रयत्नात आपल्या स्वत:च्या घराचीही काळजी न घेणाऱ्या आगलाव्यासारखाच कम्युनिस्ट माणूस सिद्ध झालेला आहे.