१५७
संस्थानात राहाणाऱ्या [लोकांची ] [स्थिती ]
गोठ्यात कोंडलेल्या [जनावरांपेक्षा ] [वेगळी ] [नाही ]
स्वतंत्र मजूर पक्षाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मेसर्स गडकरी, सावंत, देवरूखकर, गायकवाड, के. बी. जाधव, शामराव भोळे वगैरे मंडळीसह फलटणात जात असता वाटेत लोणंद येथे श्री. आबासाहेब खरात यांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून थाटानी पानसुपारी दिली. सदर प्रसंगी श्री. सावंत, भाऊराव गायकवाड यांची भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणात स्वतंत्र मजूर पक्षाचे सर्वांनी का सभासद व्हावे याचे थोडक्यात विवरण करून सर्वांनी सभासद व्हावे म्हणून विनंती केली. नंतर श्री. आबासाहेब खरात यांनी डॉ. बाबासाहेब आपल्या विनंतीस मान देऊन मागच्या सर्व गोष्टी विसरून येथे आले त्याबद्दल समाधान व्यक्त करून डॉ. बाबासाहेबांबद्दल वसत असलेली भक्ती व्यक्त केली
व त्यांना पुष्पहार अर्पण केला. तदनंतर डॉ. बाबासाहेबांनी श्री. आबासाहेब
खरात यांनी घडवून आणलेल्या या सभारंभाबद्दल आभार मानले. आभार मानताना त्यांनी सांगितले की, मागे असेंब्लीच्या निवडणुकीच्या वेळी सातारा जिल्ह्याचे स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार श्री. खंडेराव सावंत यांच्या मदतीसाठी मी दौरा काढला असता श्री. आबासाहेब. खरातांचे वडील चिरजीव श्री. सावंताविरुद्व होते. अशा प्रसंगी कर्तव्य म्हणून मला श्री. खराताबद्दल खरपूस टीका करावी लागली होती. असे असताही श्री. खरातांनी सार्वजनिक कार्यातील सख्ती जाणून ते सर्व विसरले आहेत ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. त्याचेच अनुकरण सर्व सार्वजनिक कार्यकर्त्यांनी गिरविण्यासारखे आहे. जमलेल्या मंडळींना हारतुरे व पानसुपारी झाल्यानंतर श्री. खरातांकडे जेवण करून डॉ. बाबासाहेब फलटणास दिनांक २३ एप्रिल १९३९ रोजी पोहचले.
फलटण संस्थानाधिपतीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आगाऊच पत्र पाठवून फराळाचे निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मेसर्स गडकरी, देवरूखकर, गायकवाड, रणपिसे, सावंत, के. बी. जाधव, शामराव भोळे वगैरे मंड़ळीसह बरोबर ४ वाजता फलटण संस्थानाधिपतीच्या खास मोटारने राजवाड्यात आले. तेथे राजेसाहेबांचे व त्यांचे सार्वजनिक कार्याबाबत थोडे बोलणे झाल्यानंतर थाटाची चहापार्टी झाली, चहापार्टीनंतर
जनता : ६ मे १९३९.