लोकशाही जिवंत ...... तर विनाश अटळ ४०७
एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचा सभासद म्हणून माझी नेमणूक झाल्याचे जाहीर
करण्यात आले. या बरोबरच जबाबदारीची बंधने आली. म्हणून मी विचार केला की अनुसूचित जातींच्या वतीने अधिकारवाणीने व स्वतंत्रवृत्तीने बोलू शकेल असा दुसरा कोणी माणूस जर निवडला तर अधिक चांगले होईल. रावबहादूर एन. शिवराज स्वतंत्रवृत्तीने आणि अधिकारवाणीने ते बोलू शकतात याबद्दलसुद्धा मला मुळीच संदेह नाही. आपल्या लोकांच्या कल्याणासाठी बऱ्याच दिवसांपासून ते परिश्रम घेत आहेत. केन्द्रीय विधिमंडळात आपले प्रतिनिधीत्व ते करीतच आहेत. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधी सांगायचे म्हणजे आपणापैकी त्यांच्या इतके शिकलेले फारच थोडे असतील. मद्रास विश्वविद्यालयाचे ते बी. ए., एल. एल. बी. आहेत. ते वकिलीचा व्यवसाय करीत असून मद्रास येथे
दहा वर्षापासून कायद्याचे प्राध्यापक आहेत. खरेच! या परिषदेचा अध्यक्ष
म्हणून त्यांच्यापेक्षा अधिक योग्य व्यक्ती शोधूनही सापडली नसती. म्हणूनच
माझ्या जागी त्यांची निवड झाल्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे.
जोपर्यंत मी भारतीय सरकारचा सभासद आहे तोपर्यंत आपली चळवळ
सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे. आपणा सर्वाचे ध्येय
हस्तगत होईपर्यंत ही चळवळ सतत कार्यप्रवण ठेवण्याची जबाबदारीही तुमच्यावर
आहे. मी तुम्हाला मदत करीन, सल्लाही देईन, परंतु प्रत्यक्ष चळवळीत भाग
घेणे मला शक्य होणार नाही. ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे. ती तुम्ही मनात
नीट बाळगली पाहिजे. म्हणूनच माझ्याशी मागच्या वीस वर्षापासून संबंधित
असलेल्या आणि आश्रयाखाली नसली तरी माझ्या नेतृत्वाखाली प्रगतीकडे
वाटचाल करणाऱ्या अस्पृश्यांच्या चळवळीची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती
सोपविताना माझ्या मुखत्यारीचा अहवाल तुमच्यासमोर मांडणे अत्यंत आवश्यक
होऊन बसले आहे. अनुसूचित जाती, भारतातील इतर जातींच्या तुलनेने कोठे
उभ्या आहेत हे ज्यांच्यावर जबाबदारी सोपविल्या जात आहेत त्यांना नीट आकलन
व्हावे म्हणून समजावून सांगणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या मुक्तीसाठी काय काय
केले आहे आणि काय करावयाचे राहिले, हे सांगणे फार जरूरीचे आहे. _
अस्पृश्यांनी सर्व दिशांनी वाटचाल करण्यासाठी जलद पावले उचलली आहेत
ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. . विशेष अशा तिनच गोष्टीचा मी उल्लेख
करतो. भारतातील फारच थोड्या जातींमध्ये दिसून येणारी राजकीय दक्षता
त्यांनी बऱ्याच प्रमाणात मिळविलेली आहे. दुसरे, त्यांनी शिक्षणात लक्षणीय
प्रगती केलेली आहे व तिसरे म्हणजे निरनिराळ्या संस्थांमध्ये आणि देशाच्या
नोकऱ्यांमध्ये निदान पाय ठेवायला त्यांनी आधार मिळविलेला आहे.