४१० डॉ. वाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे
स्पष्टपणे वेगळे आहेत, तितकेच अस्पृश्यही वेगळे आहेत आणि मुसलमानां-
प्रमाणेच हिंदुंपासून वेगळे असे राजकीय हक्क मिळण्याचा त्यांचा अधिकार
आहे, ही माझ्या राजकारणाची गुरुकिल्ली आहे. हे जर नीट लक्षात ठेवले
तर माझ्यासंबंधी किंवा माझ्या राजकारणासंबंधी कोणाचाही गैरसमज होणार
नाही. माझ्या राजकारणाचा मुख्य पाया सांगितल्यानंतर आपल्या विभक्त
राजकीय हक्कांना पूरक असणाऱ्या व मारक असणाऱ्या गोष्टींचा मी थोडक्यात
आढावा घेतो. गोलमेज परिषदेपासून सुरवात करावयाची म्हटले तर ती एक
फार भयंकर भानगड आहे व तेथे काय काय घडले हे तपशीलासह सांगून तुम्हाला
मी त्रास देऊ इच्छित नाही. अस्पृश्यांसंबंधी तेथे काय घडले या पुरतीच मर्यादा
मी घालून घेतो. तेथे म. गांधी आणि माझ्यात बराच गरमागरम वाद
झाला. अस्पृश्य लोक हिंदूंचाच एक उप-विभाग आहेत असा गांधींनी तेथे
जोराचा वाद घातला व परिणामतः ब्रिटिश सरकार जे काही राजकीय अधिकार
भारतीय लोकांना देणार असेल ते सर्व अविभक्तपणे हिंदुंच्या हाती सोपविल्या
जावेत, असे मत त्यांनी मांडले. कारण त्यांच्या मताप्रमाणे अस्पृश्यांच्या
कल्याणाची जबाबदारी केवळ हिंदूच स्वीकारू शकतात. मी स्वीकारलेली विचारसरणी पूर्णतः भिन्न होती. राष्ट्रीय जीवनात अस्पृश्यांचा ठळकपणे स्वतंत्र असा घटक आहे असे मी प्रतिकारात्मक मत मांडले. स्पृश्य हिंदू अस्पृश्यांचे जन्मजात शत्रु असल्यामुळे ते अस्पृश्यांचे विश्वस्त होऊच शकत नाहीत. अस्पृश्यांची उन्नती करण्यासाठी राजसत्तेचा उपयोग करण्याऐवजी ते गुलामगिरी सतत कशी टिकून राहील यासाठीच तिचा उपयोग करतील आणि म्हणूनच अस्पृश्य आणि हिंदू यांचेकडे राजकीय हक्कांची विभागणी करणे अत्यंत आवश्यक आहे, अशातऱ्हेने अस्पृश्यांच्या हातात राजसत्ता येईल व स्वतःच्या कल्याणासाठी किवा हिंदूंच्या जुलूमापासून व पिळवणुकीपासून आमचा बचाव करण्यासाठी तिचा उपयोग करता येईल. महात्मा आणि इतर हिंदुंनी आमच्या हक्कांचा पाडाव करण्यासाठी कोणकोणत्या हिकमती केल्या हे विस्ताराने सांगावे असे मला वाटत नाही. गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचा विजय झाला व महात्म्याचा पराजय झाला इतके सांगितले म्हणजे पुरे. या चढाओढीचे फळ जातीय निवाड्याच्या रूपाने प्राप्त झाले. त्याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे भारताच्या राष्ट्रीय जीवनात अस्पृश्यांचे पृथक अस्तित्व मान्य करण्यात आले व - विभक्तपणे राजकीय हक्क मिळण्याचा त्यांचा अधिकार कबूल करण्यात आला. हे जातीय निवाड्याचे मुख्य महत्त्व होय.