२२६
कामगारांना मानवी हक्क जरूरीचे आहेत
गुरुवार तारीख ६ डिसेंबर १९४५ रोजी दुपारी ११ वाजता सेक्रेटरीएट मध्ये लेबर प्रां. कमिशनर्स, सल्लागार व इतर अधिकारी यांच्या परिषदेचे मुंबईत उदघाटन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आजपर्यंतची परिस्थिती अशी होती की, मूठभर सत्ताधाऱ्यांच्या हातात सरकारची सूत्रे होती व त्यांच्या अरेरावीपणाच्या कारभाराखाली कामगार वर्ग दडपून जाणे व औद्योगिक घंदेवाल्यांची वाढ होणे या गोष्टी शक्य होत्या, पण तो काळ बदलला असून सत्तेच्या व कायद्याच्या जोरावर कामगार वर्गाना दडपणे शक्य राहिले नाही. सध्याच्या राज्यघटनेप्रमाणे हिंदुस्थान सरकारला काही करता येत नाही. कामगारांचा प्रश्न प्रांतिक सरकारकडे असल्यामुळे पंचाईत पडते. पैसा देऊन कामगार मिळू शकले तरी त्यांना वाटेल तसे वागवता येत नाही. कामगार हा मनुष्य आहे व मानवाचे हक्क जे आहेत ते कामगाराला असणे जरुरीचे आहे. लढाया संपल्या असल्या तरी भांडवलवाले व कामगार यांच्यातील लढा काही कमी महत्त्वाचा नाही. सध्या हिंदुस्थान सरकारपुढे तीन मार्ग आहेत. तडजोडीचा, कामगार वेतन निश्चित करण्याचा व कामगार व मालक यांच्यातील संबंध निश्चित ठरविण्याचा या परिषदेत विचार केला जाणे जरूर आहे.
TTT
जनता : १५ डिसेंबर १९४५.