४६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्याबद्दल तुमच्या मनात शंका असू नये. १९३५ साली भरलेली मुंबई इलाखा महार परिषद ही महार जातीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी _ झाली आहे. ती परिषद अपूर्व, अवाढव्य व पूर्ण प्रातिनिधिक अशी झाली आहे. तेव्हा अशा परिषदेने पास केलेले ठराव वास्तविक सर्व महार जातीने मानावयास पाहिजे व महार जातीतील बहुसंख्यांक लोक ते ठराव मानतातही. मात्र महार जातीतील काही थोडे लोक अद्याप जुन्या परंपरेलाच धरून आहेत, असे माझ्या कानावर आले आहे. अशा लोकांना मला असे सांगावेसे वाटते की, अल्पमतवाल्या लोकांना नेहमी बहुमतवाल्या लोकांप्रमाणे वागावे लागते. सध्याच्या कौन्सिलचेच उदाहरण घ्या. सध्या कौन्सिलमध्ये काँग्रेसचे बहुमत आहे त्यामुळे ते करतील त्या कायद्यांना मान देणे आपणास भागच पडते. ' जातीसाठी खावी माती ' अशी म्हण आहे. मग जातीने धर्मांतराबद्दल दिलेला निर्णय मानणे आपले कर्तव्य नाही काय ?
अनेक कार्यासाठी जातीकडेच आपणास जावे लागते. मग जातीने ठराव केला लो मान्य का नसावा ? हिंदू धर्माप्रमाणे आपण जे पाळीत होतो ते सर्व धार्मिक सण-वार सोडून दिले पाहिजेत. हे सोडून देण्याचे कारण आज जे मी सांगणार आहे ते मात्र निराळे आहे. हिंदू धर्माप्रमाणे जे काही विधी करतात ते धर्माच्याच नव्हे तर नीतीच्या दृष्टीने रास्त असतात काय याचा आपण विचार केला पाहिजे. काही विधीत तर अतिशय बाष्कळपणा भरलेला असतो. उदाहरणार्थ, शंकराच्या नावाने लोक सोमवारी उपवास करतात व शंकराच्या पिंडीची बहुतप्रकारे पूजा करतात. परंतु शंकराची पिंडी ही काय वस्तू आहे, याचा कोणी विचार केला आहे ? ती दुसरे तिसरे काहीही नसून पुरुष-स्त्रीच्या संभोगक्रियेची प्रतिमा आहे. अशा बीभत्स प्रतिमेचे गोडवे आपण गावे का ? रस्त्यावर श्वानाप्रमाणे जर नर-नारी वाह्यातगिरी करू लागले तर आपण त्यांची फुलाने पूजा करायची की जोड्याने? मग पार्वती-शंकर यांच्या त्याच क्रियेच्या प्रतिमेला म्हणजे देवाच्या बीभत्सपणाला आपण पूजावे काय ?
गणपतीचासुद्धा तसलाच प्रकार ! गणपतीची कथा अशी आहे की एकदा पार्वती नग्न स्नान करीत होती. त्यावेळेस शंकर कोठेतरी दुसरीकडे गेला होता. म्हणून पार्वतीने आपणास कोणापासून उपसर्ग पोहोचू नये म्हणून आपल्या अंगावरचा मळ काढून त्याचा रक्षणकर्ता गणपती बनविला. तेव्हा मळातून उत्पन्न झालेल्या अमंगळाला देव कसे मानावयाचे ? ईश्वर निष्कलंक, मूर्तीमंत, पवित्र असावयास पाहिजे. परंतु हिंदू धर्मातील देव मोठे विचित्र आहेत ! म्हणून त्यांची पूजा करू नये, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे.