१९-१२-१९५१ राजकीय हक्कांची जाणीव झाल्यानेच बलाढय संस्थांशी लढा देता येईल - Page 338

२९०
राजकीय हक्कांची जाणीव झाल्यानेच
बलाढ्य संस्थांशी लढा देता येईल

मुंबईच्या शिवडी लेबर कँप महिला मंडळातर्फे ता. १९ डिसेंबर १९५१ रोजी रात्रौ ७ वाजता जुन्या सिद्धार्थ कॉलेज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी त्यांना ५०१ रुपयांची थैली सौ. माईसाहेबांचे हस्ते अर्पण करण्यात आली. त्या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित महिलांना उद्देशून भाषण केले. ते म्हणाले,

भगिनींनो, आजच्या प्रसंगी आपण दिलेल्या देणगीबद्दल मी आपल्या सर्वाचा फार ऋणी आहे. सध्या आपणास पैशाची फारच जरूर आहे. म्हणून कोणतीही देणगी मग ती लहान असो अगर मोठी असो फारच महत्त्वाची

- आहे. परंतु एवढ्यानेच आपली कामगिरी संपत नाही. ३ तारखेस आपणास मोठी कामगिरी बजावयाची आहे व ती देणगी या देणगीपेक्षा कित्येक पटींनी बहुमोलाची आहे. `

येथे जमलेल्या बहुतेक स्त्रिया मोलमजुरी करणाऱ्या आहेत. तरीपण इतर समाजातील सुशिक्षित स्त्रियांपेक्षा त्यांना राजकारणाविषयी जास्त आवड आहे असे आजच्या प्रसंगावरून सिद्ध होत आहे.

इतर समाजाच्या मानाने आपली लोकसंख्या फारच थोडी आहे. तरीपण काँग्रेस सारख्या बलाढ्य संस्थेशी आपले उमेदवार लढा देऊ शकतात. याचे कारण आपल्या समाजात झालेली आपल्या राजकीय हक्कांची जाणीव. इतर समाजातील शेकडा २५ लोक मतदान करतात तर आपल्यापैकी शेकडा ९० मतदार मतदान करतील व म्हणूनच आपल्या उमेदवारास इतर बलाढ्य पक्षांशी टक्कर देणे शक्य होते.

जानेवारी ३ तारखेस मात्र आपण आपली कामगिरी अगदी व्यवस्थितपणे पार पाडून आपल्या उमेदवारास निवडून द्याल अशी आशा आहे.

जनता : २२ डिसेंबर १९५१.