२९७
मी संघर्ष करून अस्पृश्यात
जाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई राज्यातील व मध्य प्रदेशातील प्रमुख कार्यकर्त्यांची परिषद सिद्धार्थ कॉलेजमध्ये रविवार दिनांक १७ ऑगस्ट १९५२ रोजी भरली होती. या सभेत अगोदर जाहीर केल्याप्रमाणे ` “शेड्यूल्ड कास्ट्स् इंप्रुव्हमेंट ट्रस्ट” तर्फे मुंबईत जो हॉल बांधण्याचा संकल्प बाबासाहेबांनी जाहीर केला आहे त्यासंबंधी विचारविनिमय झाला.
दलितांचे परमंपूज्य डॉ. बाबासाहेब यांचे सभागृहात आगमन होताच सर्वांची अंतःकरणे आनंदातिशयानी भरून आली. टाळ्यांच्या प्रचंड.गजरात अभिमान . भरल्या अंतःकरणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. इतक्या दिवसांनी आपल्या नेत्याचे पवित्र दर्शन घडल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना एक प्रकारचा अनिवार्य आनंद झालेला दिसला. . मुंबई राज्यातील प्रमुख कार्यकर्ते, जिल्हा अध्यक्ष वगैरे बरीच मंडळी सभेस हजर होती. प्रांताध्यक्ष दादासाहेब गायकवाड, ज. से. बापूसाहेब राजभोज, बॅरिस्टर बापूसाहेब कांबळे, दादासाहेब शिक, श्री. आर. जी. खंडाळे, दौंड; दादासाहेब पोवार, मनमाड; पी. जी. रोहम, नगर; सावंतसाहेब, सातारा; श्री. बी. सी. कांबळे, मुंबई शहरचे अध्यक्ष खरात, ज. से. भातनकर, श्री. बाबर, सोलापूर; जिल्हाध्यक्ष श्री. पी. टी. मधाळे, सातारा वगैरे प्रमुख कार्यकर्ते हजर
होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
बंधुंनो,
अस्पृश्यांच्या उद्धारासाठी एका माणसाला एका युगात जे काही करता येणे शक्य होते ते मी केले आहे. माझे काही मार्ग यशस्वी झाले; काही झाले नसतील पण माझे कार्य मी धैर्याने चालूच ठेवले आहे. २५ वर्षात मी तुमच्यासाठी जे कार्य केले ते एवढ्या अवधीत एका व्यक्तीने कधीही, कुठेही केलेले नाही. हे मी गर्वाने सांगत नाही तर आत्मविश्वासाने सांगतो. ही वस्तुस्थिती आहे. माझ्या कार्याची दिशा तीन पद्धतीची होती !
एक, अस्पृश्य समाजात प्रथम स्वाभिमान निर्माण करणे! हे कार्य पृथ्वीमोलाचे मला वाटले. मी राजकारणात पडण्यापूर्वी अस्पृश्य समाज कोणत्या पातळीवर होता, कसा माणुसकीहीन बनला होता, याचे मी एक उदाहरण देतो.
जनता : २३ ऑगस्ट १९पर.