२०-४-१९५४ निवडणुकीद्वारे जागा मिळविणे हे एक साधन आहे, साध्य नव्हे - Page 416

३१६
निवडणुकीद्वारे जागा मिळविणे हे एक [साधन ] [आहे, ]
साध्य नव्हे

दि. २० एप्रिल १९५४ रोजी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना हितोपदेश करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

_ गेल्या निवडणुकीत शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या झालेल्या पराभवामुळे माझे सहकारी हताश झाले असावेत आणि काहींना या निवडणुकाच नको, असेही वाटत असावे. परंतु त्यांनी असे हतबल होण्याचे काहीच कारण नाही. राजकारण हे पायरी पायरीने चढ घेत जाते. मी तरी अपयशाची कधीच पर्वा केली नाही, करीत नाही आणि यापुढेही करणार नाही. केवळ निवडणुकीत जागा मिळविणे हे फेडरेशनचे ध्येय नाही. निवडणुकीद्वारे जागा मिळविणे हे एक साधन आहे, साध्य नव्हे. फेडरेशनचे साध्य-ध्येय अस्पृश्य जनतेचा उद्धार करणे हे आहे आणि जोपर्यंत अस्पृश्य समाजाची सर्वांगीण उन्नती होत नाही तोपर्यंत शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन पक्षाची जरूरी आहे, नव्हे अत्यंत निकड आहे, आणि फेडरेशन तोपर्यंत जिवंत राहील, असे मी निक्षून सांगत आहे. ज्या काही फुटीर वावटळी उठल्या असतील त्या वारा संपल्यावर नाहीशा होतील, त्यांची खंत बाळगू नका. फेडरेशन पक्ष नसेल तर अस्पृश्यांना भारताच्या राजकारणात स्वाभिमानाचे स्थान उरणार नाही. फेडरेशनला अपयश येण्यामुळेच दिवसेंदिवस आपण आपल्या उद्धारासाठी नवनव्या कार्यक्रमाची आखणी करीत आहोत. जे फेडरेशनचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्या सर्वांना असे सांगणे आहे की फेडरेशनला अपयश येणे हे वाऱ्याने झोडपलेल्या झाडासारखे आहे. परंतु त्यामुळे त्या फेडरेशनरूपी झाडाचे मूळच मरून गेले, असा अर्थ लावणे चुकीचे ठरेल. तेव्हा डोळे उघडून सतत कार्य करीत राहा.

जनता : २४ एप्रिल १९५४.