११४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
ही आमची सूचना मान्य करून सरकार ती विलंब न करतां अमलांत
आणील किंवा नाहीं याबद्दल आम्हांस थोडीशी शंका येते. आमचे इंग्रज सरकार
प्रतिगामी जरी नसलें तरी बरेच धिम्मे आहे. मार्च ऑन करण्याऐवजी होतां होईल तो मार्कटाईम करण्याचें अवलक्षण त्याच्या अंगी अगदी खिळून गेलें आहे. व सामाजिक प्रश्न आला कीं, त्याचे पायच लटके पडतात. हें भय उघड करून सांगण्याचें कारण असें की, स्पृश्य लोकांप्रमाणें इंग्रज अधिकाऱ्यांतही आम्हांस शिष्टाचारानें कांहीं दिवस तरी वागा असा उपदेश करणारे लोक आढळले आहेत. चालू वहिवाटींनें ज्या गोष्टी अस्पृश्य लोकांस करण्याचा प्रघात नाहीं त्या गोष्टी त्यांना हक्कानें करतां येणार नाहींत असे जे स्पृश्य लोक म्हणतात त्यांना शिष्टाचार व कायदा यांतील भेद कळत नाहीं. पण आमच्या इंग्रज सरकारनें मात्र तशी भूल करूं नये. ज्याप्रमाणें आपल्या शेजाऱ्याशीं नीट बोलावें, तो आजारी पडला तर त्याची विचारपूस करावी, तो अडचणीत असतां त्यास द्रव्यद्वारा मदत करावी या गोष्टी शिष्टाचाराच्या आहेत, तसेंच स्पृश्य लोंक आपणांपेक्षां विशेष पवित्र व सन्मान्य आहेत त्यांचे सेवक म्हणून अस्पृश्यांनी त्यांच्या खांदास खांदा लाउं नये, देवळांत किंवा तळ्यावर जाऊन ती अशुद्ध करून त्यांचीं मनें दुखवूं नयेत, त्यांस लवून दुरून मुजरा करावा, त्याच्याप्रमाणेंच पोषाक करून त्यांची बरोबरी करण्याची हांव धरूं नये वगैरे वगैरे गोष्टी शिष्टाचाराच्या असतील. परंतु शिष्टाचार म्हणून त्या अस्पृश्य लोकांवर केव्हांही लावतां येणार नाहींत. आमच्या इंग्रज अधिकाऱयास आम्हांस स्पष्टपणें असें सांगावयाचें आहे की, या बाबतीत स्पृश्य व अस्पृश्य यांच्या मधील लढ्यांत हिंदु व मुसलमानांच्या लढ्यांत जी विचार सरणी टिळकांनी मांडली होती तीच विचारसरणी अमलांत आणिली पाहिजे. हिंदुमुसलमानांच्या वादांत शिष्टाचार पाळावयाचा किंवा कायदा पाळावयाचा या विषयीं लिहितांना टिळकांनी असें सांगितलें आहे की “ शिष्टाचार सक्तीने अमलांत आणणें हें सरकारचें काम नव्हें. इतकेंच नाहीं तर सरकारकडे गेलें असतां काययद्याप्रमाणेच न्याय व्हावयाचा अशी जोपर्यंत लोकांची
समज आहे तो पर्यंतच ते सौजन्याने काम करण्यास तयार असतात. आमचे
म्हणणें यापेक्षां निराळें नाहीं. आधी अस्पृश्यांना जे त्यांचे कायदेशीर हक्क आहेत ते द्या. मग शिष्टाचाराची भाषा बोलूं. जी विचार सरणी स्पृश्यलोकांनी मुसलमानांस लागू करावी असें म्हणतात तीच अस्पृश्यांच्या बाबतीत इंग्रज अधिकाऱ्यांनी स्पृश्यलोकांत लागूं केली तर त्यांना कोणी दोष देऊं शकेल असें आम्हांस वाटत नाहीं. म्हणून शिष्टाचाराप्रमाणें स्पृश्य लोकांस वचकून अथवा भिऊन अस्पृश्य लोकांना आपले हक्क सोडून द्या अथवा त्याच्या मनोभावनेनुरूप ते सांगतील तशा प्रकारच्या निर्बंधास कबूल व्हा असा कमकुवत पणाचा सल्ला
डब्ल्यू-२०७३-८ ब