आपलेपणाची साक्ष दे नाहीं तर पाणी सोड - Page 222

१७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आहे, त्यांत किती तथ्य आहे, हें दुसरीकडे छापलेल्या इतर वर्तमानपत्रकर्त्यांच्या अभिप्रायावरून] वाचकांनींच ठरवावे. " प्रबोध “ पत्राच्या संपादक महाशयास आमची अशी सूचना आहे की, शिवराळपणाचा आरोप जरी खरा असला तरी त्यांत मोठा अपराध आहे असें आम्हास वाटत नाही. समाजांत म्हण पडली आहे कीं, तोंडाळ बरी पण * * * नको शिवराळपणा चालेल पण शीलशुन्यता चालणार नाहीं. “प्रबोध“ पत्राच्या संपादकाची विचारशुद्धि जितक्या उच्च प्रतीची आहे अशी ते शेखी मिरवितात, तितक्याच उच्च प्रतीची त्यांची जर विचारशुद्धि असती तर आम्हास उपदेश करण्याचा त्यांना अधिकार आहे, असें आम्हीं मान्य केले असतें,परंतु त्यांची विचारशुद्धी किती हीन वृत्तीची आहे याचें प्रत्यंतर त्यांनीं दिलेल्या अभिप्रायांतच पहावयास मिळते. संपादक महाशय म्हणतात. “हिंदुस्थानांत ज्या काळामध्ये औषधालाहि मुसलमान किंवा ख्रिस्ती नव्हता त्या काळांतील अस्पृश्यतेची गोष्ट एका प्रकारें वेगळी होती पण आजच्या सारख्या काळामध्ये विधर्मी व गोमांसभक्षक असे लोक स्पृश्य समजण्यांत येत असतां रामकृष्णास भजणारे व गाईलाहि पूज्य मानणारे असे स्वधर्मीयच लोक पुरातन कालाप्रमाणें अस्पृश्यच मानण्यांत यावेत, हा अन्याय यापुढे चालू रहाणें केव्हांहि इष्ट नाहीं.” वरील उद्गारांवरून संपादक महाशय अस्पृश्यता काढणार, ही केवळ अस्पृश्यता म्हणजे अनीति किंवा अधर्म आहे म्हणून नव्हे, तर मुसलमान लोक टपून बसले आहेत म्हणून ! जर या देशांतून मुसलमान लोकांची ब्याद निघून गेली तर अस्पृश्यांची माणुसकी ओळखण्यास हे संपादक महाशय तयार होणार नाहींत. अस्पृश्यता निवारणा सारख्या पवित्र कार्यास आपदधर्माच्या कोटींत बसविणारानीं त्रिशुद्धीच्या आवश्यकतेचा पाढा दुसऱ्यास वाचून दाखवावा हें नवल नव्हे काय ?

केवळ मुसलमानांच्या बडग्यामुळेंच अस्पृश्यता नष्ट करणें इष्ट आहे, हें सनातन धर्मीच कबूल करीत असतांना अस्पृश्य लोकांस तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारा, असा उपदेश केला तर त्यांत डॉ. उद्गांवकरांना कां राग यावा, हें आम्हांस कळत नाहीं. सदरहू डॉक्टर महाशयांनी रणगर्जनेच्या ता. ६-६-२७ च्या अंकात “'अस्पृश्यतानिवारणावर डॉ. आंबेडकरांचा तोडगा, “ या मथळ्याखाली एक लांबलचक लेख प्रसिद्ध केला आहे. सदरील लेखांत बहिष्कृत भारताच्या ता. २० मेच्या अंकातील “अस्पृश्यवर्गाची जबाबदारी,” या अग्रलेखावर ही स्वारी तुटून पडली आहे. आम्ही आपल्या अग्रलेखांत जी “बेलगामी भाषा,” व जे “अविवेकी विचार” मांडले होते ते त्यांना न खपल्यामुळे '“सुज्ञ मनुष्य अविवेकाचा दास होऊन आपली जबाबदारी झुगारुन देऊ वाटेल तसे IS लागतो-तेव्हां त्या माणसाला जागें केलें, त्याला विवेकाची मात्रा पाजली तर रागाने, त्वेषाने धुंद झालेली त्याची

१ पाहा, परिशिष्ट क्रमांक १६.

डब्ल्यू-२०७३-१२ ब