पुर
अस्पृश्यता काढून टाकणे ही सुधारणा, न्याय, भूतदया व राष्ट्रेक्य यांच्या दृष्टीनें अत्यंत आवश्यक
दुसरीकडे नागपूरचें श्री. घोरपडे यांचें पत्र प्रसिद्ध केलें आहे. त्यावरून महाड येथें जो सत्याग्रह करावयाचें योजिलें आहे त्याला उदारमतवादी लोकांचा अधिकाधिक पाठिंबा मिळत आहे असें दिसून येईल. श्री. घोरपडे यांनीं प्रदर्शित केलेले विचार मननीय आहेत. श्री. जवळकर यांनीं आमच्या सत्याग्रहाच्या चळवळीतून ब्राह्मणांना वगळण्याची जी ses सुचविली आहे ती आम्हांला मान्य नसल्याचें यापूर्वी आम्हीं दर्शविलेंच आहे. श्री. घोरपडे यांचेंहि मत तसेंच आहे हें पाहून आम्हांस समाधान वाटतें. ब्राह्मण जातींत जन्मलेला कोणीच मनुष्य मनापासून उदारमतवादी असूं शकणार नाहीं असें आमची मनोदेवता आम्हांस सांगत नाहीं. एवढेंच नव्हे तर आतापर्यंतचा आमचा तसा अनुभवहि नाहीं. आमच्या कार्याविषयीं सहानुभूति बाळगणारे सर्व लोक आम्हांस पाहिजेत, मग ते ब्राह्मण असोत वा ब्राह्मणेतर असोत. ब्राह्मणांना वगळण्यांत तत्वाच्या दृष्टीने चूक होईलच; परंतु तसें करणें गैरमुत्सद्दीपणाचेंहि होईल. आणि आमची खात्री आहे कीं, ज्या ब्राह्मणेतरांना बहिष्कृत वर्गाविषयी मनापासून
कळकळ आहे, अस्पृश्यतानिवारण्याच्या प्रश्नाविषयी तळमळ वाटते आणि त्या
कामीं शक्य तितका आपला हातभार लागावा अशी मनापासून इच्छा आहे, त्या ब्राह्मणेतरांकडून केवळ आम्हांस कांही ब्राह्मणांनीं मदत करण्याची इच्छा दाखविली आणि आम्हीं त्यांची ती मदत स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आम्हीं योजिलेल्या पवित्र कार्यास हातभार लावण्यांत कसूर होईल असें आम्हांस वाटत नाहीं. इतकेंच नव्हें तर खुद्द श्री. जवळकर हेहि श्री. घोरपडे यांच्याप्रमाणेंच ब्राह्मणांना सत्याग्रहाच्या चळवळींत भाग घेऊं देण्याला हरकत करूं नये असे म्हणतील अशी आमची खात्री आहे. भांडण तत्त्वासाठी आहे. तें कोणत्याही एका व्यक्तींशीं किंवा कोणत्याही एका जातीशीं नाहीं. पुण्याहून आमच्या एका ब्राह्मण भगिनीनें आपल्या पतीच्या संमतीनें महाडच्या सत्याग्रहांत स्वयंसेविका म्हणून भाग घेण्याची आपली इच्छा व तयारी आहे असें मुद्दाम पत्राद्वारे कळविलें
t पाहा, परिशिष्ट क्रमांक- २०.
A पाहा, परिशिष्ट क्रमांक-१७.