२६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
शेवग्याच्या झाडावर जोंपर्यंत उपजीविका होऊं शकते तोंपर्यंत उदरनिर्वाहाचा दुसरा मार्ग शोधणें जरुर वाटत नाहीं. या बाबतींतील एका श्रीमंत कुटुंबाची गोष्ट अत्यंत बोधप्रद असल्यामुळें ती आम्हीं येथें देत आहोंत. " एक श्रीमंत कुटुंब दरिद्रावस्थेप्रत पोहोंचलें. “ त्यांच्या अंगणांत एक शेवग्याचें झाड होतें. त्यांच्या शेंगा गुजरीत स्वतः विकल्या तर आब जातो म्हणून त्या रात्रीं काढून ते एका माळ्याला विकीत आणि गुपचुप तो देईल त्या किमतीवर गुजराण करीत. कुटुंबांत चार पांच भावांचा विस्तार होता. तेव्हां आळी-पाळीनें कित्येकांना उपवास काढावे लागत. एक दिवस त्यांचा सोयरा रात्रीं मुक्कामाला आला. त्याला व लहान मुलांना जेवण्यास बसविले व बाकीच्यांनी भूक नाहीं म्हणून वेळ मारुन नेली. सोयरा निजला असें पाहून कारभाराऱ्यानें नित्यक्रमाप्रमाणें शेंगा माळ्याला दिल्या, आणि त्यांचे दाम घेतले. सोयरा जागा होता. त्याला सर्व अवस्था अगोदर माहित होतीच, आणि हा प्रकारहि त्यानें पाहिला. चार पांच धडधाकट भाऊ आज जे उपवास काढतात, ते या शेवग्यामुळें अशी त्याची खात्री झाली; आणि त्यानें जिकडे तिकडे सामसूम झाल्यावर रात्रीं तें झाड कापून काढलें व कोणाला न विचारतां आपले घराची वाट धरली. सकाळीं घरांत जिकडे तिकडे हा:हा:कार झाला. ' हगवणीला बायको आणि नागवणीला सोयरा ' असें म्हणतात. ह्या सोयऱ्यानें तर दहा पांच मण धान्य पाठविण्याच्या ऐवजी अर्धकोर भाकर देणारा शेवगाहि तोडला, म्हणून सर्व त्याला शिव्या शाप देऊं लागले. तो दिवस कसाबसा गेला, आणि रात्री सर्व कुटुंब एकत्र जमून त्यांनीं विचार काढला कीं, आतां घर सोडलें पाहिजे. सर्वांनी रोजगार केला आणि दोन वर्षात घर सुधारले. नंतर सर्वजण दिवाळीला घरीं जमलेले पाहुन तो सोयराहि मुद्दाम तेथें आला, तेव्हा सर्वांनी त्याचे पाय धरले, व कबूल केलें कीं, “ तुम्हीं झाड तोडलें नसतें तर आम्हाला घर सुटतेंना व आमचें दारिद्र्य जन्मभर फिटतेंना. “
ही गोष्ट महार वतनदारांना तंतोतंत लागू पडत नाही असें कोण म्हणेल ? वतन म्हणजे महारांच्या दारांतील शेवगा आहे. तो कापून काढल्याखेरीज त्यांच्या परिस्थितींत क्रान्ति घडणार नाही. आणि त्यांच्या जीवनक्रमांत अशा प्रकारची क्रांति घडल्याशिवाय महार लोक स्वतंत्रपणे उद्योग करुन राहण्यास प्रवृत होणार नाहीत. वेसकरकी हे महारांच्या महत्त्वाकांक्षेवर मोठे दडपण आहे. वेसकरकी ही आपली अढळ बादशाही, यापेक्षा आपल्याला श्रेष्ठ असा दर्जा तो काय असावयाचा या भावनेने ग्रस्त झालेले महार आईबाप आपल्या मुलांना वेसकरकीपेक्षां दुसरी उन्नतावस्था प्राप्त करुन देण्याचा विचार मुळीं आपल्या मनाला शिवूंसुद्धा देत नाहीत. वेसकरकीच्या व्यसनांत सांपडल्यामुळे कोणीहि महार पेशा घेण्याची इच्छा करीत नाही. मळलेल्या वाटेनें जाण्याची संवय