आग्हीहि सत्यशोधकीच . . . सदृधर्माची चळवळ ३३१
कलेक्टर आमची बाजू सोडील असा संशय आम्हांस दासगांवला पोहोंचेपर्यंत आला नव्हता. दासगांवला जाईतोंपर्यंत फक्त दिवाणी कोर्टाचा तात्पुरता मनाई हुकूम सुटल्याचें आम्हास माहीत होते. परंतु तो मनाई हुकूम मोडण्याचा आम्ही निश्चय केलेला होता. दिवाणी कोर्टाचा मनाई हुकूम मोडल्याने आम्हांस कोर्टाला सहा सहा महिने शिक्षा करण्याचा अधिकार आहे हें आम्ही जाणून होतों. तथापि ती शिक्षा भोगण्याची आमची तयारी होती. व तसें आम्ही आमच्याकडे चौकशीस आलेल्या अधिकाऱ्यांस अगदीं स्पष्टपणें कळविलें होतें. दिवाणी कोर्टाचा हुकूम मोडल्यामुळें, जे मोडतील ते तुरुंगांत जातील, आपल्याला ह्या भानगडींत पडण्याचे कारण नाहीं असें म्हणून, कलेक्टर त्रयस्थाप्रमाणें स्तब्ध बसेल अशी आमची समजूत होती. व ती समजूत चुकीची आहे असे मानण्यांत कसल्याच प्रकारचें कारण घडलें नाहीं. परंतु अस्पृश्यांची बाजू घेणारा कलेक्टर कोर्टाची इभ्रत राखण्याच्या दृष्टीने स्पृश्यांच्या बाजूचा झाला. व स्पृश्य लोकांच्या जुलुमापासून बचाव करण्यास त्याचें साहाय्य अवश्य असल्यामुळे, त्याचा सल्ला ऐकावा लागला. यावरून आमच्या मित्राला कळेलच कीं, सत्याग्रह थांबला तो तुरूंगात जाण्याच्या
भीतीमुळें किंवा कलेक्टरच्या भिडेमुळे थांबला नसून, अस्पृश्य वर्गाचे हिताकरितांच थांबविण्यांत आला. त्यांत स्पृश्य लोकांतील टवाळ कंपूस हंसण्यास जागा झाली असेल. पण स्पृश्य लोकांकडून शाबासकी मिळविण्यासाठी हैं कार्य मुळी आरंभिलेलेंच नव्हते. तें केवळ अस्पृश्यांच्या हित संवर्धनासाठींच आरंभिलेले होतें. तुरुंगात जाण्यानें तें साधलें असतें तर तें करावयास कोणाचीच ना नव्हतीं.
११. आमच्या मित्रांना आमच्या चळवळीस सत्यशोधकी वळण लागेल याचे भय वाटत आहे. सत्यशोधकी चळवळ ! म्हणजे ब्राह्मणाचा द्वेष करणारी, राजकारणांत भाग न घेणारी, सरकारच्या नजरेकडे लक्ष ठेवून काम करणारी अशी आजपर्यंतची महाराष्ट्रांतील रुढ कल्पना आहे. व या कल्पनेत समाविष्ट असलेलें वळण अस्पृश्यांच्या चळवळीस न लागेल अशी खबरदारी घेण्याविषयी त्यांनी आम्हांस इशारा दिला आहे. आमच्या मित्रास आम्ही असें सुचवितो कीं, आम्हींहि सत्यशोधकीच आहोंत. व त्याबद्दल आम्हांस कोणत्याहि तर्हेचा विशाद न वाटता उलट आनंदच वाटतो. सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सद्धर्माची
चळवळ असें आमचें ठाम मत आहे. इतकेंच नव्हे तर दरेक स्वराज्यवाद्यांनें
सत्यशोधकी असलेंच पाहिजे असें आमचें ठाम मत आहे. आमच्या मित्रांनी चालू सत्यशोधकी चळवळीवर जो आरोप केला आहे तो मात्र कांहीं अंशी खरा आहे असे कबूल करणें प्राप्त आहे. परंतु हे वळण या चळवळीस कां लागले याचा
† पाहा, परिशिष्ट क्रमांक-३.