चोखामेळा ४५७
आजपर्यंत असा संत झाला नाही व पुढे होणार नाही. त्या काळी संत लोकांनी संतांकडेच पाहिले. संतांचा विटाळ केला नाही. पण इतर अस्पृश्यांकडे संतांनी दुर्लक्ष केले. माणूस म्हणून माणसाकडे पाहिले नाही. हे विधान खरे आहे. पण त्या काळच्या मर्यादा सांभाळून आपल्या समाजाकरिता काही कार्य चोखोबांनी केले नाही काय ? किंवा आपल्या लोकांची कळ त्यांनी सोसली नाही काय ? किंवा समाजासाठी काहीच केले नाही काय? चोखोबाचे अभंग बारकाईने वाचले व अभ्यासिले तर त्या काळातदेखील त्यांनी आपल्या समाजासाठी फार झीज सोसली. "त्यांचेसाठी क्रांतिकारक असे कार्य केले. कारण चोखोबाचा छळ पदोपदी व क्षणोक्षणी झाला. सारे जीवन त्यांना छळातून व अपमानातून काढावे लागले. असे का? एक तर ते महार होते. त्यांची थोरवी धर्म मार्तडांना व ब्राह्मणांना, बडव्यांना पाहवत नव्हती. ती त्यांना सहन होत नव्हती. शिवाय दुसरे असे की, सामाजिक व आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असली तरी आपल्या समाजाची कड ते घेत असले पाहिजेत'' कारण त्यांनी जे अभंग केले आहेत, ते पहा. यावरून समाजाची कड ते घेत असत हे अगदी उघड आहे.
वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ | पुराणे अमंगळ विटाळांची ||
ब्रह्मिया विटाळ विष्णुसी विटाळ | शंकरा विटाळ अमंगळ ॥
जन्मता विटाळ मरता विटाळ | चोखा म्हणे विटाळ आदि अंती I
हे सर्वच विटाळलेले आहेत, वेद, पुराण, ब्रह्मा, विष्णू अन् शंकराशीही विटाळ आहे. यातून कोणीच सुटले नाही.
चोखा म्हणे मज नवल वाटते | विटाळ परते आहे कोण ॥
माझा व माझ्या समाजबांधवांचा तुम्ही विटाळ करता. पण खरे काय ते तुम्हास कळत नाही. केवळ आमचेवर सारा भर दिसतो. चोखोबा म्हणतात,
विटाळाचे अंगी विटाळाचे फळ | चोखा तो निर्मळ नाम गाय ||
जो विटाळ करतो त्यास तेच फळ मिळते. माझा व महार समाजाचा विटाळ करून काय उपयोग.
अरे चोखा कसा आहे | चोखा तो निर्मळ गाय नाम II
चोखा अगदी निर्मळ आहे. पवित्र आहे. चोखोबा म्हणतात-
“धिक तो आचार धिक् तो विचार | धिक् तो संसार धिक् जन्म |
धिक ते पठण धिक् ते पुराण | धिक् यज्ञ हवन केले तेणे Il
धिक ते ब्रह्मज्ञान वाउग्या ह्या गोष्टी | दया क्षमा पोटी शांती नाही ॥”