परिशिष्ट-२६
ब्राह्मणेतर पक्ष
“ मद्रास इलाख्यातील जस्टिस पक्षाप्रमाणे मुंबई इलाख्यातील ब्राह्मणेतर पक्षाला सत्ता काबीज करता आली नाही. कारण ब्राह्मणेतरांतील सुशिक्षितांचा अभाव. १९२१ ते १९३० च्या काळात ब्राह्मणेतरांत, विशेषत: मराठा व तत्सम जाती यांच्यात, बराच शिक्षणप्रसार झाला. त्याचा उपयोग सरकारी नोकऱ्या मिळविण्याकडे झाला. सामाजिक व शैक्षणिक बाबतीत सदर सुशिक्षितांनी भरीव कार्य केले, पण ते डोळ्यात भरण्यासारखे नव्हते. या पक्षात मराठा व मराठेतर हे प्रश्न उपस्थित झाले, ते काही स्वार्थसाधू पुढाऱ्यांच्या अदूर दृष्टिकोनामुळे. या ब्राह्मणेतर पक्षात अस्पृशांना जे स्थान होते ते त्रिशंकूचे. ब्राह्मणेतर पुढारी आणि कार्यकर्ते यांच्या मनावरील ब्राह्मणी वर्चस्व नष्ट झालेले लोक पक्षात होते. पण वेदादि धर्मशास्त्रांच्या प्रामाण्यावर यांचा विश्वास होता. ही शास्त्रे त्यांना वंद्य असल्यामुळे त्यातील वर्णाश्रमधर्म त्यांना उघडपणे मान्य होता आणि अस्पृश्यांची अस्पृश्यता गुप्तपणे मान्य होती. सत्यशोधक
व ब्राह्मणेतर पक्ष यांचा कार्यक्रमात अस्पृश्यतानिवारण विषय होता, पण त्याची
अंमलबजावणी ते प्रथमच्या काळात करीत नसत. पुढील काळात म्हणजे १९२१ ते १९२७ च्या काळात राजर्षि छत्रपती शाहू महाराज, सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर पक्ष यांच्या पुढे जे ध्येय होते ते हिंदु समाजातील ब्राह्मणांचे वर्चस्व नष्ट करावयाचे. हिंदूंतील जाती नष्ट कराव्यात असे ते मधून मधून बोलत तरी त्याबद्दल त्यांना फारशी ओढ नव्हती. आणि हिंदु समाज हा एकजात, एकसंघ असा समाज व्हावा याबद्दल त्यांचे विचार व कार्यक्रम नक्की नव्हते. १९२५-२६ च्या नंतरच्या काळात असे विचार आणि कार्यक्रम अस्तित्वात आले. “
“ ब्राह्मणेतर चळवळीत पुढाकर घेणाऱ्या मराठ्यांनी जनसेवेचे तर खूप अवसान आणले होते. विशेषतः कै. राजर्षि शाहू छत्रपतींच्या अमदानीत सरकारी नोकऱ्यांचे भडाभड राजीनामे देऊन ब्राह्मणेतर चळवळीची स्वयंसेवा करण्यासाठी पुष्कळ मराठे वीर मी मी म्हणून मिशांवर पीळ भरीत पुढे सरसावले. कोणी वर्तमानपत्रे सुरू केली. कोणी संघ काढले. कोणी व्याख्यानांची धुमश्चक्री चालवली, कोणी ग्रंथमाला काढल्या. असा मारे एकच घडधडाट उडाला ! लोकांना वाटले की कोणी हे देवदूत अवचित आमच्या उद्धारासाठी अवतीर्ण झाले. शाहू 'गहाराजांचा पाठिंबा जाताच मात्र हे सारे बहाद्दर खरेखुरे स्वतःची सेवा करणारे ठरल्याचे उघडकीस आले. कोणी कोल्हापूर दरबारचे मानकरी होऊन बसले. कोणाला ३० रुपये, कोणाला