* भाकरी मागितली-दगड दिला / ' १९३
आशयाचा व सरकाररीत्या हुकूम काढिल्याचें कळतें. 'एकंदर परिस्थिती बिकट व भयानक अशी वाटल्यावरुन सरकारी हुकूमान्वयें सर्व लोकांस कळविण्यांत येतें कीं, काळेराम मंदिराच्या आसपास १०० यार्डाच्या अंतराच्या आंत कोणीही इसमानें निरर्थक फिरावयाचें नाही किंवा बसावयाचे नाहीं. तीहीपेक्षां जास्त जमावानें कुणीही मंदिरापाशी जावयाचे नाहीं.' हा हुकूम १४४ क्रो. पी. सी. च्या कायद्यानुसार जाहीर केला आहे. ह्या हुकूमाची मुदत एक महिन्यापर्यंत आहे.
अस्पृश्यांना मज्जाव करण्याकरतां सनातनी मंडळींनी बाहेर गांवाहून-विषेशतः मुंबईकडून स्वयंसेवक मिळविण्याचे प्रयत्न जारीनें सुरु चालविलें आहेंत. या लढ्याचा समाधानकारक निकाल लागण्याकरितां व एखादा तडजोडीचा मार्ग शोधून काढण्याकरितां नाशिक म्युनिसिपालिटीचें अध्यक्ष रा. ब. प्रधान हे सनातनी मंडळींची सभा भरवून प्रयत्न करीत असल्याचे कळतें. मंदीरप्रवेश सत्याग्रह कशारीतीनें यशस्वी करतां येईल याबाबतीसंबंधी अस्पृश्य पुढारी मार्ग शोधून
काढण्याच्या विचारांत आहे. मुंबईहून बरेचसें स्वयंसेवक सत्याग्रहाचा लढा लढविण्यासाठी अगोदरच सत्याग्रह छावणींत येऊन राहिलें आहेत. रामनवमीच्या दिवशीं बहुतेक ठिकाणाहून स्वयंसेवक लोक नाशकास येतील. सत्याग्रह संग्रामाची वादळी हवा नाशिककरांना बेचैन करीत आहे असें एकंदर परिस्थितीवरुन अजमावयास कांहींच हरकत नाहीं. नाशिक मार्गावर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर कीं जय' चा ध्वनि धुमधुमूं लागला आहे.
ता. १४-४-१९३२.
आज सत्याग्रह छावणीत सत्याग्रह वीरांच्या तुकड्या जमू
लागल्या. सालाबादाप्रमाणे यंदाहि महारवाड्यांतून पंचवटीपर्यंत मिरवणूक काढण्यांचें ठरलें होतें व त्याप्रमाणे मिरवणुकीला लोक जमाव हजारांनीं जमूं लागला होता. नाशिक शहराकडे वळणाऱ्या प्रत्येक रस्त्यांतून 'डॉ. आंबेडकर Ol जय” चा जयजयकार ऐकूं येत होता. आज अस्पृश्य आपले धोरण कशारीतीनें आंखणार याची कल्पना सनातनी मंडळींना होत नव्हती. ते आपल्या संघटणेच्या अभावी बेचैन स्थितींत असलेले दिसत होते. अस्पृश्य मंडळींचा उत्साह दांडगा दिसत होता. वाटेल त्या बिकट परिस्थितीला धैयाने व शिस्तीने तोंड देण्याचें त्यांनी ठरविलेंच होतें. माणुसकीच्या व स्वाभिमानाच्या लढ्यांत मृत्यूची पर्वा करणें हें केवळ नामर्दपणाचें लक्षण त्यांना वाटत होते. भीतीचे असे काढलेले उद्गार त्यांना बिलकूल पसंत पडत नव्हते.