४
पानगलच्या राजाचा मृत्यू
मद्रासच्या ब्राह्मणेतरपक्षाचे पुढारी रामराय निंगार उर्फ पानगलचे राजेसाहेब यांच्या निधनामुळें एक कर्तृत्वशाली व्यक्ती देशांतुन नाहींशी झाली आहे. मद्रासच्या ब्राह्मणेतरपक्षानें तिकडील ब्राह्मणेतर जनतेची ब्राह्मणीवर्चस्वापासून सुटका करण्यांत जें अप्रतिम यश संपादन केलें त्यांच्या श्रेयाचा मोठा वाटा राजेसाहेबांकडे जातो. डॉ. नायर व सर त्यागराय चेट्टी यांच्यानंतर ब्राह्मणेतर पक्षाला राजेसाहेबांसारखा खंदा पुढारी लाभला नसता, तर शाहुछत्रपतीच्या पश्चात् मुंबईच्या ब्राह्मणेतर पक्षाची जी अवस्था झाली आहे तीच मद्रासच्या ब्राह्मणेतर पक्षाची झाली असती. सारेच पुढारी पण खरा पुढारी कोणीच नाहीं. या अवस्थेंतुन कोणतीही चळवळ बचणें कठीण असते, पण राजेसांहेबामुळें मद्रासच्या ब्राह्मणेतर पक्षावर ही आपत्ती ओढवली नाहीं व त्यामुळे तो पक्ष महत्वाचीं कामें पार पाडूं शकला. मुंबईपेक्षांही मद्रासच्या ब्राह्मणेतर जनतेवर ब्राह्मणशाहीच्या वर्चस्वाची पकड जास्त बळकट आहे. ब्राह्मणेतर पक्षाला मारण्यासाठी सरकारचे सहाय्य घेण्यासही तिकडील स्वराजिस्ट व संपूर्ण स्वातंत्र्यवादी ब्राह्मण तयार असतात. अशा स्थितीतून ब्राह्मणेतर चळवळ चालवणें कठीण तर खरेंच पण राजेसाहेबांमुळे ते सुकर झालें. स्वतांचें घोडे पुढे न दामटतां इतरांना योग्य सानमरातब देऊन त्यांच्या हातुन कामें करून घेणें हा पुढारीपणाचा अत्यावश्यक गुण त्यांच्या अंगीं होता. त्यामुळेच त्यांना हें कार्य करतां आलें.
राजेसाहेबांच्या कारकिर्दीतील ब्राह्मणेतर पक्षाचा इतिहास संस्मरणीय आहे. या अवधींत मोठमोठ्या अधिकाराच्या जागा ब्राह्मणेतर पक्षानें काबीज केल्या, व अशा तर्हेनें ब्राह्मणीवर्चस्वाचा सरकारी पाठिंबा पुष्कळच ढिला करून टाकला. देवस्थान बिलही याच कारकिर्दीत पास झालें; व समाजसुधारणा व सरकारी कायदा यांची सांगड जुळविली गेली. या अपूर्व यशाच्या मुळाशीं राजे साहेबांची निःस्वार्थ बुद्धी आहे हें विसरून चालणार नाहीं. ते स्वतः श्रीमंत होते. पण इतर श्रीमंत लोकाप्रमाणें ते जनतेपासून अलग राहिले नाहींत अगर बोलघेवड्या राजकारणाशी तद्रूप झाले नाहींत. जनतेला झुलविण्यासाठीं नव्हे तर तिच्या हितासाठीं ते सार्वजनिक कार्यात पडले व [तेंच ] [ध्येय ] [डोळ्यांपुढे ] [ठेऊन ] त्यांनीं काय करतां येईल तें केलें. सरकारशी सहकार्यही केलें व विरोधही